Type a search term to find related articles by LIMS subject matter experts gathered from the most trusted and dynamic collaboration tools in the laboratory informatics industry.
बालसाहित्य म्हणजे मोठ्या माणसांनी लहान मुलांसाठी लिहिलेले वाङ्मय. या वाङ्मयात, राजा-राणी, राजकन्या, पऱ्या, देवदूत, बोलणारे प्राणी, जादुगार, राक्षस आणि सद्गुणी- दुर्गुणी माणसे असतात. असे वाङ्मय लिहिणारे जगात अनेक लेखक होऊन गेले. हॅन्स ख्रिश्चन ॲन्डरसन हा त्या लेखकांतला एक प्रख्यात लेखक. त्याने लिहिलेल्या परीकथांची जगातल्या सर्व भाषांत भाषांतरे झाली आहेत. लेविस कॅरोलचे ’ॲलिस इन् वंडरलॅन्ड, मार्क ट्वेनचे ’टॉम सॉयर’ आणि ’ॲडव्हेन्चर्स ऑफ हकरबरी फिन’, फिलिपा पिअर्सचे ’मिडनाईट गार्डन’, इ. यांशिवाय थोड्या मोठ्या मुलांसाठी हार्डी बॉइज, नॅन्सी ड्ऱ्यू, हॅरी पॉटर वगैरे पुस्तके जगप्रसिद्ध आहेत.
मराठीतही बालसाहित्य लिहिणारे अनेक लेखक आहेत. बालसाहित्यात अगदी छोट्या बाळांसाठी बडबडगीते, वाचता येणाऱ्या लहान मुलांसाठी कविता, नीतिकथा, साहसकथा, अन्य गमतीदार कथा, प्रवासवर्णने, आणि कधीकधी छोट्या कादंबऱ्या असतात.
बालसाहित्याला पहिले मुद्रित स्वरूप १८०६ साली मिळाले ते ‘बाळबोध मुक्तावली’च्या रूपाने. इसापनीती, पंचतंत्र, हितोपदेश अशी पुस्तके म्हणजे थेट उपदेश करणाऱ्या बोधकथा होत्या. बालसाहित्याची संकल्पना ही जागतिक स्तरावरची असली तरी भारतामध्ये आणि महाराष्ट्रात बालमानसशास्त्र आणि बालसाहित्य यांचा गांभीर्याने विचार सुरू होण्यास मादाम मॉन्टेसरी यांची १९४४ची पुणे भेट कारणीभूत आहे, असे म्हणतात.
बालसाहित्याचा प्रथम कालखंड हा छत्रे, दामले, ओक, आपटे यांचा मानला जातो. त्यानंतर साने गुरुजी, महादेवशास्त्री जोशी, ना. ह. आपटे, भा. रा भागवत, गंगाधर गाडगीळ, दत्ता टोळ, अमरेंद्र गाडगीळ, राजीव तांबे, शंकर सारडा यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. सत्तरच्या दशकामध्ये एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू संपुष्टात येऊ लागल्याने नव्या पिढीला आजी-आजोबांच्या गोष्टी दुष्प्राप्य होऊ लागल्या. काळाची नेमकी गरज म्हणून संस्कारक्षम बालसाहित्याला याच काळात सुगीचे दिवस आले. सत्तरच्या दशकानंतर बालसाहित्याची मागणी वाढून दुर्गा भागवत, पिरोज आनंदकर, सुधा करमरकर, शांता शेळके, लीला भागवत, सरिता पदकी यांची अनेक पुस्तके याच काळात पुढे आली. ऐंशीच्या दशकामध्ये शैलजा काळे या एकट्या लेखिकेची बालसाहित्याची शंभर पुस्तके प्रकाशित झाली होती. भा.रा.भागवतांचीही एकूण पुस्तके साधारणपणे तितकीच असावीत.